सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी दोन राज्यांच्या पोलिसांची विधाने भारत-पाक युद्धासारखी: उज्ज्वल निकम
जळगाव: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबत घडलेल्या घडामोडी अत्यंत क्लेशदायक आहेत, दोन राज्यातील पोलिसांमध्ये सुरु असलेली विधाने भारत-पाक युद्धासारखी वाटतात, अशा भावना ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलेल्या आहेत. “सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहचलेले आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये असे पहिल्यांदाच घडत आहे.
दोन राज्यांचे पोलीस अशाप्रकारे विधाने करत आहेत, की जसे काही हे भारत आणि पाकिस्तानचे युद्ध आहे. अशा प्रकारच्या स्थितीमुळे या देशाचा नागरिक म्हणून मला अत्यंत दुःख होत आहे, असे उज्ज्वल निकम म्हणालेले आहेत. “सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी कलम 174 अन्वये चौकशी सुरु केली आहे. या घटनेनंतर 45 दिवसांनी सुशांतसिंहच्या वडिलांनी बिहारमधील पाटणा येथे सुशांतच्या मृत्यूबाबत काँग्निझेबल ऑफेन्सबाबत फिर्याद दाखल केली होती. त्यात एका अभिनेत्रीचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे” असे उज्ज्वल निकम म्हणालेले आहेत.