सुरक्षा रक्षकांच्या वाहनावर जमावाचा हल्ला
- वाहनाने उडवलेल्या तीन जखमींचे निधन
- काश्मीरातील वातावरण पुन्हा तापले
श्रीनगर – श्रीनगर शहराच्या बाह्य भागात सीआरपीएफच्या वाहनाला तेथील स्थानिक नागरीकांनी लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला केला त्यावेळी वाहनचालकांनी हल्लेखोरांना चुकवून तेथून निघून जाण्याच्या प्रयत्नात तीन जणांना चिरडले. त्यात जखमी झालेल्या तिन्ही जणांचा नंतर मृत्यू झाल्याने श्रीनगरात पुन्हा हिंसाचाराचे थैमान सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करावी लागली आहे.
श्रीनगर पोलिसांनी सीआरपीएफवरच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सरकारने श्रीनगरात रमझानच्या निमीत्त शस्त्रसंधी लागू करून एक चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच येथील गटांशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंहही लवकरच काश्मीरात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज हा प्रकार झाल्याने शांतता प्रस्थापनेचे सारेच मुसळ केरात गेले आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह काश्मीरतील सर्व घटकांशी तसेच हुर्िर्रयत नेत्यांशीहीं चर्चा करणार होते. पण या घटनेमुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा नव्याने जे हिंसाचाराचे वातावरण निर्माणझाले आहे त्यातून शांतता प्रक्रियेत अडथळाच निर्माण झाला आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयात फिरू लागल्याने त्यातून तणावात भरच पडत आहेत.
या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडावे असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी केले असून त्यांनी म्हटले आहे की शस्त्रसंधीच्या काळात जवानांना शस्त्र वापरण्यास बंदी घालण्यात आल्याने त्यांनी आता काश्मीरींच्या विरोधात वाहनांचा उपयोग सुरू केला आहे.