सुधीर मुनगंटीवारांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारीवरून उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली
मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विशेष हक्कभंग प्रस्तावावरून भाजपा नेते सुधीर मुनगुंटीवार आणि शिवसेना मंत्री अनिल परब यांच्यात वादविवाद झालेला पाहायला मिळाले. वैयक्तिक टीका-टिप्पणी केल्यास हक्कभंग कसा होऊ शकतो असा सवाल भाजपाने केला, तर आमदारांना विशेषाधिकार दिले कशाला? तुम्ही कधी हक्कभंग वापरले नाही का? मागील ५ वर्षात किती हक्कभंग मांडले हे दाखवू का? सभागृह असताना कोर्टात जायचं कशाला? असा सवाल अनिल परब यांनी केला.
दरम्यान, माझे कुटुंब माझी जबाबदारी यावरूनही मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझे पेपर आणि माझी मुलाखत, माझे पोलीस आणि माझा एफआयआर असा शब्दात मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. पुरवणी मागण्यावेळी सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत होते, त्यावेळी त्यांनी पालघर साधु हत्येचा मुद्दालाही हात घातला. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात साधुंची हत्या कशी काय होऊ शकते? तुम्ही संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री विरोधकांच्याबाबत घृणास्पद भावना ठेऊन वागतायेत हे योग्य नाही असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.
पाहाः महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 2020 लाइव्ह प्रक्षेपण
तुमचं आव्हान मी स्वीकारतो…
पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध विषयांवर सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, आमदारांच्या वाहन चालकांना पैसे दिले नाहीत, दिव्यांगाचे पैसे दिले नाहीत, परंतु मुख्यमंत्री कार्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पैसे दिले असा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला. त्यावेळी अजित पवार उत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या भाषणात अडथळा आणतो तो पुन्हा कधी निवडून येत नाही असं मुनगंटीवार म्हणाले. यावर तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवाच असं चॅलेंज अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवारांना दिलं.