सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी महाराष्ट्रात लागू होणार नाही – बाळासाहेब थोरात
महाईन्यूज |
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा भेदभाव करणारा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही, अशी शपथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी म. गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावर घेतली आहे. नागरिकत्व दुरुस्ती आणि नोंदणीविरोधात काँग्रेसने महात्मा गांधींचे समाधीस्थळ राजघाटवर सोमवारी सत्याग्रह केला, यावेळी ते बोलत होते. दुपारी तीन ते रात्री आठ असे पाच तास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा तसेच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह मध्य प्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्री कमलनाथ, अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते या सत्याग्रहात सहभागी झालेले होते.
थोरात म्हणाले की, “महाराष्ट्र कायमच धर्मनिरपेक्ष विचारधारेचं राज्य राहिलेलं आहे. या राज्यानं स्वतःला कधीही जात आणि धर्माच्या नावावर विभाजित होऊ दिलेलं नाहीये. महाराष्ट्र आजही या संविधान बचावाच्या लढाईत न्यायासोबत, सत्यासोबत ठामपणे उभा आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या माध्यमातून भारताच्या आत्म्याला ठेस पोहोचणार आहे. सीएए हा कायदा भेदभाव करणारा आहे, त्यामुळे आम्ही भाजपाची ही असंविधानिक वागणूक सहन करणार नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू होणार नाही.”