सीमेवर चीनचा मुजोरपणा सुरूच, सीमेवर पुन्हा सैन्यांची जमवाजमव
नवी दिल्ली: सीमेवर निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनची दोन स्तरावर चर्चा सुरू आहे. राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. मात्र सीमेवर चिनी सैन्याचा मुजोरपणा सुरूच असून आता फिंगर- 3 भागात चिनी सैन्याने जमवाजमव केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे तणाव कमी व्हावा असं चीनलाच वाटत नसल्याचं स्पष्ट होतेय असं तज्ज्ञांचं मत आहे. रशियाची राजधानी मॉस्को इथं झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर हे त्यांच्या समकक्ष चिनी मंत्र्यांना भेटलेले होते. सीमेवरच्या तणावानंतर सर्वोच्च पातळीवर झालेल्या या चर्चा होत्या.
सीमेवर तणाव वाढू नये, शांतता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळणार नाही यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं. मात्र चीनने तसा प्रयत्न केलेला नाही. फिंगर-4 जवळच्या उंचावरच्या जागा भारतीय सैन्याने ताब्यात घेतल्यावर चिनी सैन्याने ही जमवाजमव केली केल्याचं बोललं जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर एक निवेदन जारी केलं आणि त्यात म्हटलेलं आहे की, हा 5 मुद्यांवर सहमती झाली आहे. यामध्ये दोन्ही देशांमधील संबंधात कोणत्याही मतभेदांमुळे वाद होऊ नये असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांनी कबूल केलेलं असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर मॉस्को इथे झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सीमेवर शांतता आणि सद्भाव कायम ठेवण्यावर सहमती दर्शवलेली आहे.