‘सीआयडी’कडे अधिकाऱ्यांची वानवा
कोल्हापूर : गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा सखोल तपास व्हावा आणि दोषींना कडक शिक्षेपर्यंत पोहोचवावे यासाठी सीआयडीकडे (गुन्हे शोध विभाग) तपास सोपवले जातात. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे सीआयडीच्या अधिकाऱ्यांवर तपासाचा अतिरिक्त ताण पडत आहे. सीआयडीच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात केवळ १० अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सध्या १६ गुन्ह्यांचा तपास सोपविण्यात आला आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने गुन्ह्यांची उकल होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.
राज्याच्या पोलिस दलातील सीआयडी अर्थात गुन्हे शोध विभाग हा तपासासाठी विश्वासार्ह विभाग मानला जातो. राज्यातील अनेक गंभीर आणि महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करून संशयित आरोपींना गजाआड करण्याचे काम सीआयडीने केले आहे. आजही महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे सोपवण्यासाठी आग्रह धरला जातो. कोल्हापुरात गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला आणि अनेक धक्कादायक खुलाशांनी लोकांची उत्सुकता वाढवलेला वारणा लुटीचा तपासही सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीचे कोल्हापुरातील पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी नुकतीच या गुन्ह्याचा तपास स्वीकारला. मात्र कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे या लुटीचा तातडीने तपास करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.