सामाईक सेवा केंद्रांना चळवळ बनवण्यात ग्रामीण उद्योजकांचा वाटा महत्वाचा
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची अपेक्षा
नवी दिल्ली – देशभरात सामाईक सेवा केंद्र चळवळ क्रांतिकारी बनवण्यात ग्रामस्तरीय उद्योजकांनी प्रमुख भूमिका पार पाडली, असे मत केंद्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती-तंत्रज्ञान आणि कायदे व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले आहे. ते आज नवी दिल्लीत टेलि-सेंटर उद्यमशीलतेवरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केल्यावर बोलत होते.
तळागाळापर्यंत प्रमुख सेवा पुरवण्यात ग्रामस्तरीय उद्योजकांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. उत्तम कामगिरी बजावणाऱ्या ग्रामस्तरीय उद्योजकाला पुढल्या वर्षापासून एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
देशाच्या विविध भागात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करणाऱ्या ग्रामस्तरीय उद्योजकांचे त्यांनी अभिनंदन केले. सामाईक सेवा केंद्रांच्या माध्यमातून स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत ही लोक चळवळ बनावी असे ते म्हणाले.