‘सामना’तून माझ्यावर गलिच्छ टीका,चंद्रकांत पाटलांच्या या आरोपाला शिवसेनेचं प्रत्युत्तर….
मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी ‘सामना’त अग्रलेख लिहण्यात आला होता. ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’ अशा शब्दात चंद्रकांत पाटलांवर ‘सामना’तून बोचरी टीका करण्यात आली होती. ही भाषा अशोभनीय असल्याची तक्रार ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
वाचा :-कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप ताकदीने लढणार – चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘सामना’मधून गलिच्छ टीका झाली, असे म्हणणे योग्य नाही. ‘सामना’त ठाकरी शैलीचा वापर केला जातो. तोच ‘सामना’चा ब्रँड आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषा ‘सामना’त लिहिली जाते, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले.
ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांचे खंडन केले. ‘सामना’मधून मला वाटत नाही कोणती गलिच्छ टीका होते. ‘सामना’ची विशिष्ट शैली आहे, सामना ब्रँड आहे आणि ती ठाकरे शैली आहे. त्या ब्रँडला साजेशी भाषाच लिहिली जाते. ती भाषा गलिच्छ नसते, असे परब यांनी म्हटले.