सामनाचा अंक फाडून राष्ट्रवादीने केला शिवसेनेचा निषेध
पिंपरी – राज्याच्या सत्तेत राहून देखील विरोधकाचे आयते आवसान आणणा-या शिवसेनेला दुतोंडी गांडुळाची उपमा दिल्याने सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर सडेतोड टिका करण्यात आली. त्यामुळे पवार यांची मानहानी झाल्याने पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सामनाचे संपादक संजय राऊत आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी सामना पेपर फाडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, विठ्ठल काटे, प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, अरूण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, धनंजय भालेकर, आनंदा यादव, वर्षा जगताप, शकुंतला भाट, संदीप चिंचवडे, प्रकाश सोमवंशी, प्रदीप गायकवाड, विशाल काळभोर, अमीत बच्छाव, रशीद सय्यद, यतींद्र पारीख, दिपक साकोरे, संतोष वाघेरे, धनाजी विनोदे, मयुर जाधव, साकी गायकवाड, निलेश निकाळजे, प्रकाश थोरात, धनंजय जगताप, रूपाली गायकवाड, मंगेश बजबळकर, साईश कोकाटे, सनी डहाळे, शहीद खान, योगेश मोरे, अलोक गायकवाड, सुनिल अडागळे अमय नेरूळकर, मनोज सुतार, रामदास मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनात शहराध्यक्ष वाघेरे-पाटील म्हणाले की, अजित पवारांचे नेतृत्व अवघ्या महाराष्ट्राने मान्य केल्यामुळे आदरणीय लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने महाराष्ट्रात सलग १५ वर्षे सत्तेत राहून लोकहिताची कामे केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, रोजगार क्षेत्रात महाराष्ट्र कायम देशात प्रथम क्रमांकावर राहिल. उलट युती सरकारच्या मागील कार्यकाळात आणि आताच्या भाजपा प्रतित सरकारच्या शेतकरी, युवक विरोधी धोरणांमुळे महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे, सत्तेत राहून सत्तेची फळे उपभोगायची आणि नागरीकांवर अन्यायकारक जाचक अटी लादायच्या यामुळे राज्यासह कामगार नगरीत या सरकारविरूध्द तीव्र नाराजी आहे, कामगारांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर हल्लाबोल आंदोलन सुरू आहे, या आंदोलनास मिळणारा प्रतिसाद पाहून शिवसेनेला सत्ता जाण्याची भिती वाटते. उद्योग मंत्र्यांनी कामगार विरोधी धोरणांना परवानगी दिल्यामुळे राज्यातील सर्व कामगारांत या सरकार विरूध्द असंतोष आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी दिल्यासारखे करायचे आणि कागदपत्रांच्या पुर्ततेत वेळ घलवायचा. यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखिल नाराजीची भावना आहे. हे सरकार पाच वर्षे पुर्ण करण्याची शक्यता नाही. हे पवार साहेबांनी वारंवार सांगितले. पवार साहेब आणि अजितदादांनी महाराष्ट्राचा केलेला विकास पाहता त्यांचेच नेतृत्व राज्यातील जनतेला हेवे आहे. यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या झोपा उडाल्या आहेत. त्यातून आलेल्या नैराश्यामुळेच संजय राऊत अशी गरळ ओकत आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे, असे वाघेरे-पाटील म्हणाले.