साध्वींच्या विधानावर भाजपा प्रवक्ते म्हणतात, ‘निषेधचा प्रश्नच नाही, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार’
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी सुतक संपले असे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले आहे. याच वक्तव्यावरुन भाजपाच्या प्रवक्त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘साध्वी यांना त्यांच्यावर झालेला अत्याचार लोकांसमोर मांडण्यचा अधिकार आहे’ असं मत भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमध्ये गुरुवारी एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले भाष्य केले. भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार असणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. त्यांनी केलेल्या या विधानाबद्दल बोलताना वाघ यांनी, ‘या वक्तव्याचा निषेध करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर अत्याचार केले, त्यांचे हालहाल केले. हे अधिकार पोलिसांना कोणी दिले होते?’ असा उलटा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.