सागांवातील रस्त्यांची दूरवस्था; ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
– स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी
सागांव – शिराळा तालुक्यातील सधन म्हणून ओळखले जाणा-या सागांवातील मुख्य रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पावसाळापूर्व कामे नियोजित वेळेत न केल्यामुळे सर्वसामान्य गावक-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गावातील पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र, गावातील लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रलंबित समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नालेसफाई, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची डागडूजी करण्याची आवश्यकता होती. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली दिसत नाही. परिणामी, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्या खंड्यांत पाणी साचले आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर खंड्यांचा अंदाज न आल्यामुळे किरकोळ अपघातही वाढले आहेत. दुसरीकडे, नालेसफाई न केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थीत होत नाही. परिणामी, काही ठिकाणी पाणी साचून डबके निर्माण झाली आहे. त्याठिकाणी डासांचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहेत.
सागांवातील मुख्य चौकातून वाडीभागाई व ढोलेवाडीकडे जाणा-या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. तसेच, मुख्य चौकातून ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराकडे जाणा-या रस्त्यावरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी, स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
————-
लोकप्रतिनिधींना तरुणांचे साकडे…
सागांवात सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आगामी दोन महिन्यात गावात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आपआपल्या परिने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे, गावातील तरुणांनीही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याची तयारी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडून गावातील रस्त्यांची डागडूजी करुन घ्यावी, अशी मागणी तरुणांमधून होत आहे. यासाठी काही होतकरू तरुणांनी लोकप्रतिनिधींना साकडे घातले आहे.