साखर उद्योगाला साडेआठ हजार कोटींचा बुस्टर
मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी केंद्राने साडेआठ हजार कोटींच्या पॅकेजला बुधवारी मान्यता दिली आहे. याअंतर्गत तीस लाख टन साखरेचा बफर स्टॉक केला जाणार आहे. इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांना ४४०० कोटी रुपयांचे कर्ज पुरवले जाणार आहे आणि साखरेचा किमान दर २९ रुपये करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी ३ कोटी १५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. दरवर्षी सुमारे २.५ कोटी टन साखरेचे उत्पादन होते. अतिरिक्त साखर कारखान्यात पडून आहे. शिवाय यंदाही अतिरिक्त साखरेचे उत्पादन होणार आहे. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे कारखान्यांना उत्पादन मूल्यापेक्षा कमी दरात म्हणजे २६ रुपये किलो दराने साखर विकावी लागत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने शेतकऱ्यांचे पैसे थकले आहेत. ऊसकरी शेतकऱ्यांचे २२ हजार कोटी रुपये साखर कारखान्यांकडून थकले आहेत. त्यापैकी काही रकमेची तरी परतफेड या पॅकेजमुळे होऊ शकेल, अशी माहिती केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.