सांगोल्यात दुष्काळ जाहीर करा, शेतक-याची मागणी
संभाव्य पाणी टंचाईबाबत पंचायत समितीत आढावा बैठक
टॅंकरचे प्रस्ताव आल्यास दोन दिवसात टॅंकर देवू
सांगोला ( महा ई न्यूज ) – पावसाअभावी सांगोल्यात रब्बीचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे सांगोल्यात दुष्काळ जाहीर करावा, जनावरे वाचविण्यासाठी चारा डेपो अथवा छावण्या सुरु कराव्यात, तसेच टेंभू – म्हैसाळ योजनेतून माण, कोरडा नदीवरील बंधारे, पाझर तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतक-यांनी केल्या. दरम्यान, टेंभू, म्हैसाळ योजनांची कामे मुदतीत पूर्ण करावीत. आणि मजुरांच्या हाताला काम देण्याकरिता रोजगार हमी योजनेतून विविध कामे करण्याचा प्रस्ताव देवून तो ठराव करण्यात आला.
संभाव्य पाणी टंचाई आढावा बैठक आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, सभापती डॉ. श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अॅड. सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, तानाजी पाटील, चंद्रकांत शिंदे, अशोक शिंदे, शहाजीराव नलवडे, बाळासाहेब काटकर, गिरीश गंगथडे उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले, शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, वाड्या-वस्त्यांवर योजनांची कामे चालू आहेत का, याविषयी माहिती घेतली़. कृषी विभागाकडून खरीप व रब्बी पिकांच्या परिस्थितीची माहिती घेऊन मागेल त्याला शेततळे या योजनेतून प्रत्येक गावाने पाच शेततळ्यांचे प्रस्ताव द्यावेत, अशा सूचना केल्या. यावेळी जलसंधारणाच्या पाझर तलाव, सिमेंट बंधा-याविषयी माहिती घेतली. टेंभूतून बुद्धेहाळ तलावात किती पाणी आले, या योजनेतून बलवडी व नाझरे येथील बंधारे भरून देण्याविषयी सूचना केल्या.
दरम्यान, गटविकास अधिकारी संतोष राऊत म्हणाले, २०१९ पर्यंत ९२ टँकर उपलब्ध करण्याबरोबर विहीर खोदाई, गाळ काढणे, अधिग्रहण, हातपंप या योजनांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात ३ लाख ६२ हजार जनावरांसाठी पुढील तीन महिने पुरेल इतका २८ लाख १८ हजार ३१९ क्विंटल चारा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.