सर्व पक्षीय सदस्यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्लाबोल
- शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
गुरुवारची जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक चांगलीच तापलीपुणे – वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता परस्पर तालुक्यात जावून शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा. असला मनममानी कारभार आम्ही खपवून घेणार नाही, असा हल्लाबोल जिल्हा परिषदेतील सर्व पक्षीय सदस्यांनी गुरुवारी (दि.7) झालेल्या स्थायी समिती बैठकीत केला. तसेच जिल्हा परिषदेत धोरणे ठरवण्याचा अधिकार हा केवळ आम्हालाच आहे, अधिकाऱ्यांनी त्याची पूर्तता करावी असा शब्दात सदस्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले. त्यामुळे गुरुवारची बैठक चांगलीच तापली होती.
यावेळी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, प्रविण माने, सुरेखा चौरे, सुजाता पवार, गटनेत्या आशा बुचके, गटनेते शरद बुट्टे पाटील, रणजीत शिवतारे आदी उपस्थित होते. बांधकाम
विभागाचे प्रमुख सुट्टीवर असताना, त्यांच्या खालचे अधिकारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता परस्पर तालुक्यात दौऱ्याला जातात. तेथील शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करता, ही बाब कितपत योग्य आहे. दरम्यान, या प्रकाराचा निषेध म्हणून जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. या सर्व घटनेचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले.
अधिकारी परस्पर जावून, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करतोच कसा, अशा प्रश्न उपस्थित करत सर्व पक्षीय सदस्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्या संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी मध्यस्थी करत या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल असे सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या योजना राबविताना त्याचे धोरण काय असावे, कशाप्रकारे राबववण्यात यावी याबाबत चर्चा सुरू असताना, धोरण ठरविण्याचा अधिकार हा केवळ आमचा आहे, तुम्ही फक्त त्याची पूर्तता करा अशा शब्दात सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
बैठकीतील काही ठळक मुद्दे…
* प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून विकासकामांना गती देणे
* ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीचे वेगवेगळे हेड असावे
* वाटप झालेल्या निधीचा योग्य वापर होतो का त्याची पाहणी होणे आवश्यक
* शिक्षक बदली प्रकरणात झालेल्या चुका कशा सुधारता येतील
* भविष्यातील कामे, योजना यांचे नियोजन करणे
* योजना, विकासकामे यामध्ये दिरंगाई झाल्यास जबाबदारी कोणाची