सर्व्हरची समस्या सोडवून तातडीने सातबारा द्या
- खासदार सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पुणे – सर्व्हरमधील समस्येमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सातबारे उतारे मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कर्जवाटप प्रक्रियेस उशीर होतो. यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत खासदार सुळे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली. बारामतीसह दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यातील नागरी समस्या, सिंहगडावरील स्टॉलधारकांच्या समस्या तसेच पुण्यातील रिंगरोडबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या हरकतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, सुनील चांदेरे, महारुद्र पाटील, डी. एन. जगताप, रणजीत शिवतरे, सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे, सुरेश गुजर, प्रवीण कामठे, प्रकाश हरपळे, सागर साखरे आदी उपस्थित होते.
सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सातबारा मिळत नाहीत, अशी कारणे तलाठ्यांकडून देण्यात येत आहेत. अशी तांत्रिक अडचण असेल, आणि पुढील पंधरा दिवसांत यावर तोडगा निघाला नाही, तर तलाठ्यांनी हस्तलिखित सातबारे उतारे द्यावेत. त्यामुळे कर्जप्रकरणे अडकून राहणार नाही, अशी सूचना थोरात यांनी यावेळी केली. यावर 15 दिवसांत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी राम यांनी दिले.
गरजू शेतकऱ्यांना कर्ज मिळालीच पाहिजेत. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलायलाच हवीत, अशी सूचना सुळे यांनी यावेळी मांडली. या मुख्य विषयाबरोबरच इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील सबस्टेशन, पुरंदर तालुक्यातील जेऊर फाटा रेल्वे उड्डाणपूल, शिरूर तालुक्यात रिलायन्स गॅस ट्रान्सपोर्टेशन हब इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून पिकांची हानी झाली आहे, त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, सिंहगडावरील स्टॉलधारकांचे पुनर्वसन करावे, मांगडेवाडी, फुरसुंगी, शिवणे, न्यू अहिरे या भागातून जाणाऱ्या रिंगरोडबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या काही हरकती आहेत. त्यावर सर्वसमावेशक मार्ग काढावा, दौंड आणि हिंजवडी येथे कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी औद्योगिक वसाहत भागात कचरा प्रकल्प उभारण्यात यावा, आदी विषयांवर सुळे यांनी या बैठकीत सविस्तर चर्चा केली.