सरकार नक्षलग्रस्त राज्यांत उभारणार मोबाइल टॉवर्स
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसह नक्षलवादी कारवायांग्रस्त राज्यांत ४,०७२ मोबाइल मनोरे (टॉवर्स) उभारण्यात येणार आहेत. यापैकी १३६ मोबाइल टॉवर्स महाराष्टÑात उभारले जाणार असून, केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला बुधवारी मंजुरी दिली.
गृह मंत्रालयाने १० राज्यांतील नक्षलवादी कारवायांग्रस्त ९६ जिल्ह्यांत मोबाइल टावॅर्स उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. छत्तीसगढ आणि झारखंड या सर्वाधिक नक्षलवादीग्रस्त राज्यात मोठ्या संख्येने मोबोइल टॉवर्स उभारण्यात येतील. महाराष्ट्रातील नक्षलवाद कमी होत असला तरी दळणवळण यंत्रणेमार्फत अधिक खोलवर शिरून या समस्येचा पुरता बीमोड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. सर्व टॉवर्ससाठी ७,३३० कोटी रुपये खर्च येणार आहे.
नक्षलवादग्रस्त भागात तैनात सुरक्षा कर्मचारी या नेटवर्कचा वापर करतील. या प्रकल्पातहत संपर्क सुविधेपासून वंचित असलेल्या गावातील नागरिकांनाही मोबाइल सेवा पुरविण्यात येईल. त्यामुळे या भागात आर्थिक सुधारणा होईल. तसेच मागास आणि नक्षलवादग्रस्त भागात मोबोइल सेवा उपलब्ध झाल्याने या भागातही ई-शासन उपक्रमालाही चालना मिळेल.