सरकारचे धोरण कामगारांना पोषक नसल्यामुळे कारखानदारी अडचणीत – शरद पवार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सध्याचा कामगार वर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे. किमान वेतनावर कामगारांना कंपन्या घेत नाहीत. त्यांना योग्य तो न्याय मिळत नाहीत. सरकारचे कामगारांबाबतीतले धोरण पोषक नसल्याने राज्यासह देशातील कारखानदारी दिवसेंदिवस अडचणीत यायला लागली आहे, अशी चिंता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पिंपरीत व्यक्त केली.
रहाटणी येथे आयोजित कै. भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या वतीने कामगार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी या कामगार परिषदेचे उदघाटन किमान वेतन सल्लागार मंडळांचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, अरुण बोऱ्हाडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, कॉम्रेड अजित अभ्यंकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, एच.ए. कंपनीच्या कामगारांना गेल्या 17 महिन्यांचा पगार मिळाला नाही, मुळातच केंद्र सरकारकडून या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नाही. कामगारांच्या कुटुंबियांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना किमान वेतनांचा हक्क मिळत नाही. याबाबतीत जनतेने कामगारांच्या बाजूने आवाज उठविण्याची गरज आहे. कामगारांचे प्रश्न आता जटील होत चालले आहेत. विशेषतः कंत्राटी पध्दतीमुळे कामगारांमध्ये स्थैर्य राहिले नाही. कंत्राटी कामगाराना संरक्षण दिले पाहिजे. भाजप सरकारच्या नोटबंदीमुळे हजारोजणांच्या नोक-या गेल्या, रोजंदारी कामगारांचे, असंघटित कामगारांचे अतोनात हाल झाले, कामगारांचे प्रश्न समाधानकारक सुटले नाही तर कामगारांची शक्ती एकत्रित आल्याशिवाय राहणार नाही. शहरे जस-जशी विकसित होत गेली तस-तशी विस्ताराची पावले उमटत गेली. दि. 8 व 9 जानेवारीला कामगारांच्या प्रश्न सोडविण्यासाठी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये कामगारांच्या प्रश्नांसाठी स्वत रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सरकार कामगारांच्या प्रश्नांकडे जाणूनबुजून डोळेझाक करत आहे. सरकार तर कौशल्य विकासाचा गाजावाजा करत आहे. नवीन उद्योग नाहीत. जुनेच उद्योग बंद पडत आहे. कामगार कायद्यातील बदल, कामगारांवरती झालेला अन्याय हे खऱ्या अर्थाने कामगारांचे दुःख आहे. हे वर्ष कामगारांना हक्क मिळवून देणारे वर्ष असले तरी आजच्या सरकारकडून ही अपेक्षा करणे चुकीचे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, कॉम्रेड अजित अभ्यंकर, कैलास कदम यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.