सध्या रयतेचे नव्हे, तर हुकुमशाहीचे राज्य; व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे मत
पिंपरी – छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे राजे होते. त्यांच्या काळात रयतेचे राज्य होते. महिलांचा आदर आणि कुशलतेने न्यायदानाचे काम होत होते. तर, आताचे राज्य हुकुमशाहीचे आणि स्वार्थ साधण्याचे आहे, असे मत व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
भारिप बहुजन महासंघ व सलोखा शोल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत गुरुवारी (दि.२४) व्याख्यान व वाघे-या चित्रपटातील सर्व कलाकारांचा सन्मान सोहळा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सलोखा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल ओव्हाळ होते. या प्रसंगी व्याख्यात्या प्रा. सुषमा अंधारे, भारिपचे जिल्हाध्यक्ष रामहरी ओव्हाळ, महिला शहराध्यक्ष लता रोकडे आदी उपस्थित होते.
कोकाटे म्हणाले की, ” शिवरायांच्या काळात सुजलाम सुफलाम अशी अवस्था होती. तेव्हाचे मंत्रीमंडळ आणि आताचे मंत्रीमंडळ यात जमीन अस्मानचा फरक आहे. रयतेचे राज्य निर्माण करत असताना शिवरायांना देखील काही मंडळींनी त्रास दिला. पण, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आपले काम सुरू ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या कायद्याच्या राज्यासाठी प्रकाश आंबेडकर झटत आहेत. त्यांना बहुजन समाजाने साथ द्यायला हवी” असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. सुषमा अंधारे म्हणाल्या, ” दलित, बहुजनांवरील अन्याय अंत्याचाराला पँथरपासून ते आता भारिपपर्यंत संघटनांनी आवाज उठविला. वेळेनुसार आंबेडकर चळवळीत परिवर्तन होत आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर सध्या परिवर्तनाची लढाई लढत आहेत. त्याच्या हाकेला साथ सर्व स्तरातून मिळत असून ख-या नेतृत्वाची जाण लोकांना झाली आहे. त्यांच्यावर विश्वास टाकून काम करण्याची सध्या गरज आहे”
देवेंद्र तायडे यांनी प्रास्ताविक केले. भारत कुभांर यांनी सूत्रसंचालन केले. तर, हरिष डोळस यांनी आभार मानले. सुधाकर साबळे, विजय ओव्हाळ, भानुदास दाभाडे, राहुल इनकर यांनी संयोजन केले. कार्यक्रमाला पसिरातील असंख्य नागरिकांनी उपस्थिती लावली.