संसदरत्न पुरस्कार मिळवणे हे कारकूनगिरीची किमया – गणेश खांडगे
पिंपरी ( महा ई न्यूज ) – मावळचा विकास करण्यासाठी अतिशय खमक्या उमेदवार शरद पवार यांनी आपल्याला पदरात टाकला आहे. त्याला घडविण्याची जबाबदारीही पवारांनी आपल्यावर टाकली आहे. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदरत्न पुरस्कार मिळवण्याच्या पलिकडे काहीच काम केलेले नाही. संसदरत्न पुरस्कार मिळविणे ही कारकूनगिरीची किमया आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते गणेश खांडगे यांनी केली. तसेच मावळचा विकास हा पार्थ पवारच करु शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ब्राम्हणनोली (ता.मावळ) येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्षश्री.गणेशआप्पा ढोरे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दीपकभाऊ हुलावळे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक सुनिलभाऊ ढोरे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक अशोक शेडगे संचालक महादुमामा कालेकर जेष्ठ नेते नामदेव ठुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किसन कदम, तालुका ओबोसी सेलचे माजी अध्यक्ष माऊली आढाव, जेष्ठ नेते अशोकराव घारे, माजी युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, पवन मावळ महिला अध्यक्षा जयश्री पवार, सरचिटणीस उत्तम घोटकुले माजी सरपंच माउली निम्बळे, बाळासाहेब नेवाळे, खंडू तिकोणे, सुनील डोळे, अतुल सातकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
खांडगे म्हणाले की, भाजप-शिवसेना युती सरकार म्हणजे खोटं बोला, पण रेटूंन बोला, असं सरकारचे काम आहे. आजही भाजप शिवसेेनेचे नेते दिवसभर बोंब मारत फिरतात. खोटं बोलून लोकांचा विश्वासघात करतात. उद्याच्या पन्नास वर्षातील विकास घडवायचा असेल तर पवार कुटूंबियातील उमेदवार संसदेत पाठविला पाहिजे. पवारसाहेबाशिवाय बहूजनांना न्याय देणारा नेता, संसदेत नाही. मावळच्या विकासासाठी पार्थ पवारांना निवडून देणं ही जबाबदारी आहे, असेही आवाहन त्यांनी केले.