संविधान बचाव म्हणणा-यांनी अगोदर संविधान समजून घ्यावे – भाऊ तोरसेकर
पिंपरी – भ्रष्टाचाराच्या आरोपातून ए. राजा, कनिमोळी निर्दोष सुटले की न्यायव्यवस्था सुरक्षित असते. कर्नल पुरोहित निर्दोष सुटल्यास न्याव्यवस्था धोक्यात कशी? येते. संविधानाने संसद, सरकार आणि न्यायवस्थेला एकत्रित बांधले आहे. लोकसभा चालू दिली जात नाही. न्याय पालिकेवर संशय व्यक्त करत सरन्यायधीशावर महाभियोग आणला जातो. संसद चालू देणार नाही, न्याय व्यवस्था चालू देणार नाही. याला माफिया म्हणतात. मग, आता संविधान कोणापासून वाचवायचे आहे, याचा सुजान जनतेने विचार करावा. संविधान बचाव म्हणणा-यांनी अगोदर संविधान समजून घ्यावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘जागता पहारा’ या एकमेव ब्लॉगचे लेखक भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच राज्य घटनेत बदल करण्याची तरतूद ठेवली असल्याचेही, त्यांनी सांगितले.
निगडीतील, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 1 ते 5 मे या कालावधीत 34 व्या छत्रपती शिवाजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे “संविधान वाचवा – परंतु कोणापासून ?” या विषयावरील दुसरे पुष्प बुधवारी (दि.2) भाऊ तोरसेकर यांनी गुंफले. दि.कल्याण जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक अनंत कुलकर्णी, सावरकर मंडळाचे सचिव भास्कर रिकामे, किसन महाराज चौधरी, रत्नाकर देव, महेश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, अच्युत होनप, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
भाऊ तोरसेकर म्हणाले, ”गांधी स्मारकाच्या निधीवरुन वाद केला जातो. न्यायालयापर्यंत तो वाद पोहचतो. त्यांना गांधी कसले समजले आहेत. स्वदेशीचा नारा गांधी यांनी दिला होता. परंतु, गांधीवादी स्वदेशीचा अवलंब करत नाहीत. रामदेव बाबा स्वदेशीचा अवंलब करत आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये मराठीतील पहिले दर्पण हे दैनिक वर्तमानपत्र सुरु केले. त्यावेळी दर्पणची किंमत एक रुपया होती. ज्यावेळी दोन ते तीन रुपये रोजगार होता. आता एक रुपयात वर्तमानपत्र देण्याची स्पर्धा लागली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांना माहित होते की आपण जो माल देतो, त्याची किंमत आहे. परंतु, आता वर्तमानपत्रे वाचनीय राहिली नाहीत”. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. अजित जगताप यांनी केले.