संरक्षित प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ हा प्राणी वगळावा
– खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मागणी
पुणे । प्रतिनिधी
खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचवण्यासाठी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ हा प्राणी वगळावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद केले आहे की, बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासून सातत्याने खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या कमी होत आहे. १९९७ पासून २०१८ पर्यंत जवळपास बैलांची संख्या २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर २०१९ ही संख्या २९.६३ इतकी कमी झाली आहे. १६ वी पशुगणना ते १९ वी पशुगणना या काळात ४५.६७ टक्क्यांनी बैलांची संख्या कमी झाली असल्याकडे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांचे लक्ष वेधले. वाघ, सिंह, अस्वल, माकड या संरक्षित जंगली प्राण्यांच्या यादीत पाळीव प्राणी असलेल्या ‘बैल’ प्राण्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे देशी खिलार जातीच्या बैलांचा वंश नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.
बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला आहे. बारा बलुतेदारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापार पूर्णतः थांबला आहे, ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याबाबत गिरीराज सिंह यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून गुरुवारी ही बैठक होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कोल्हे यांनी निवेदनात नमुद केले. या भेटीत गिरीराज सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याचे सांगण्यात आल्याने आपण निर्णय घेतला नाही अशी कबुली दिली. तसेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना डॉ. कोल्हे यांनी केलेल्या आक्रमक व मुद्देसूद भाषणाचं कौतुक केले.