संत तुकारामनगरच्या उद्यानातील तीन झाडांची कत्तल ; नागरिकांतून संताप
पिंपरी – शहरामध्ये विविध संस्था, सामाजिक संघटना व महापालिकेच्या प्रयत्नाने पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी तब्बल 60 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे महापालिकेच्या उद्यान विभागाने संत तुकारामनगर मधील ५ वर्षांची असलेल्या तीन झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे चांगली झाडे तोडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
संत तुकारामनगर एपीजे अब्दुल कलाम उद्यानातील किमान पाच वर्षाच्या पुढील असणारी तीन झाडे आज (बुधवारी) दुपारी तोडण्यात आली. याबाबत महापालिका उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाकडून ती झाडे तोडली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अधिक-यांनीच नियम मोडीत काढत रक्षकच भक्षक झाल्याचे दिसत आहे. एकीकडे शासन झाडे लावा-झाडे जगवा अशी जनजागृती करत असताना प्रशासनातील अधिकारी मात्र झाडांवरच कु-हाड चालवत आहेत.
महापालिकेच्या सार्वजनिक किंवा खासगी जागेतही वृक्षतोड करायची असेल, तर त्यासाठी कायद्यानुसार परवानगी आवश्यक आहे. वृक्ष तोडीचे कायदे अत्यंत कडक असल्याने एक वृक्ष तोडायचा असेल, तर त्यासाठी किमान ३ वृक्ष लावावे लागतात. परंतू, परवानगी न घेता केलेल्या वृक्षतोडीबाबत थेट पोलिसांकडे तक्रार दाखल करता येते. त्या जागेचा पंचनामा करून न्यायालयात खटलाही दाखल केला जातो.
दरम्यान, महापालिका उद्यान अधिकारी परस्पर झाडांची कत्तल करु लागल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तीन झाडे तोडून एक टेम्पो भरेल एवढे झाडाचे लाकूड संबंधित ठेकेदार घेवून गेले आहेत. याबाबत वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांनी कसलीही माहिती न देता अधिका-यांनी झाडांची तोड केलेली आहे.