संघाच्या निमंत्रणावर मुखर्जी ठाम
- अनेक कॉंग्रेस नेत्यांनी केले मन वळवण्याचे प्रयत्न
- म्हणाले मला जे काही बोलायचे आहे ते नागपुरातच बोलेन
नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरात होणाऱ्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर देशभर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
तथापी स्वता मुखर्जी मात्र नागपुरात संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत ठाम असून मला जे काही बोलायचे आहे ते नागपुरातच बोलन असे सांगून या विषयी यावर कोणतीही अधिक प्रतिक्रीया देण्याचे त्यांनी टाळले आहे.
मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याविषयी अलिकडेच कॉंग्रेसच्या अधिकृत प्रवक्त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता संबंधीत प्रवक्त्याने या विषयावर स्वता मुखर्जीच बोलू शकतील असे नमूद करून त्यावर प्रतिक्रीया देण्याचे टाळले होते. तथापी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांची खासगीत भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना भेटलेल्या नेत्यांमध्ये बंगालप्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अधिर रंजन चौधरी, जयराम रमेश, माजी केंद्रीय मंत्री सी के जाफर शरीफ, यांचा समावेश आहे. एका वृत्तपत्राला या विषयी दिलेल्या प्रतिक्रीयेत मुखर्जी यांनी म्हटले आहे की या विषयी मला जे काही बोलायचे आहे ते मी नागपुरातच बोलेन.
मी हे निमंत्रण स्वीकारल्यापासून मला अनेकांचे फोन, पत्रे निरोप आले आहेत पण मी कोणालाही प्रतिसाद दिलेला नाही असे त्यांनी सांगितले. नागपुरात 7 जून रोजी संघ शिक्षा वर्गाचा समारोप आहे त्यात मुखर्जी हे प्रमुख पाहुणे आहेत. ते तेथे काय भूमिका मांडणार आहेत या विषयी औत्सुक्य निर्माण झाले आहे. गेली पाच दशके राजकारणात कार्यरत असणाऱ्या मुखर्जी यांनी राष्ट्रपती पदावरून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणापासून ते अधिकृतपणे दूर झाले आहेत.
तथापी 82 वर्षीय मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारून कॉंग्रेसची मात्र चांगलीच गोची करून ठेवली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या प्रत्येक बाबतीत संघाला दोष देऊन त्या संघटनेच्या विचारधारेवर टीका करीत असताना आणि स्वता मुखर्जी यांनीही संघाच्या विघटनवादी भूमिकेवर टीका केली असताना त्यांनी हे निमंत्रण स्वीकारण्यामागे त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे कोणालाच उमगेनासे झाले आहे.