मी बोललोच होतो,संकट आलं की परप्रांतीय आधी पळणार – राज ठाकरे
मुंबई | ‘करोनामुळे आज जी परिस्थिती उद्भवली आहे, त्यावर माझ्याकडे, तुमच्याकडे, राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे… अगदी कुणाकडेच उत्तर नाही. संपूर्ण जग या संकटात चाचपडतंय. त्यामुळेच उगाच टीका करून कुणाचे ‘मॉरल डाऊन’ करू नका’, अशी सुस्पष्ट भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत मांडली. यावेळी महाराष्ट्रातून आपापल्या राज्यात परतत असलेल्या मजुरांवर राज यांनी कठोर शब्दांत निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी आपली मते परखडपणे मांडली.
राज्यात करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मुंबईची अशी परिस्थिती मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती, असे नमूद करत त्यांनी आपल्या भावना सांगितल्या.पोलिसांच्या जागी एसआरपीएप लावणं याचा अर्थ पोलीस कमी पडले असे नाही. दीड महिना काम करून त्यांच्यावर ताण आला आहे, तो यामुळे कमी होईल, असे नमूद करत राज यांनी या निर्णयाचे समर्थन केले. कंटेंटमेंट झोन तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवायला हवा, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील छोटे दवाखाने सुरू करायला हवेत. एमपीएससीचे जे विद्यार्थी अडकले आहेत त्यांना त्यांच्या घरी पोहचवायला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली.