श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा ठराव करा
ग्रामपंचायतींना संभाजी ब्रिगेडचे आवाहन
पिंपरी | प्रतिनिधी
खंड विश्वाचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री.श्री रविशंकर याचेवर गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ शासनाच्या विराेधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे ठराव ग्रामपंचायतींनी मंजूर करण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहेच. पण आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणूनही शिवरायांची ओळख आहे. महाराजांची त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख समाजाला पदोपदी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे राष्ट्रपुरुष आहेत.कायद्यानुसार राष्ट्रपुरूषाची बदनामी अथवा त्यांच्या विषयीचा चुकीचा इतिहास पसरविणे गुन्हाच आहे. श्री श्री रविशंकर यांच्याकडून प्रसारीत करण्यात आलेल्या व्हिडीओच्या व कॅलेंडर तसेच वृत्तपत्रांतील विवीध लेखांच्या माध्यमातून जाणिवपुर्वक इतिहासाचे विकृतीकरण करुन खोडसाळ पध्दतीने छ.शिवाजी राजांची बदनामी करण्यात आलेली आहे.
यातून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करून रामदास स्वामींचे उदात्तीकरण करण्याचे काम जाणून बुजून श्री श्री रविशंकर यांनी केलेलं आहे. या सदर प्रकार हा वेळेवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिला. आजपर्यंत शासनाकडून श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे ठराव महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने एक गाव एक ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनावर पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, संघटक ज्ञानेश्वर लोभे यांच्या सह्या आहेत.