शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरु करा; उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला UGC चा पाठिंबा
नवी दिल्ली | महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष जानेवारी महिन्यापासून सुरु करावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘यूजीसी’ अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला यूजीसीने पाठिंबा दिल्याची माहितीआहे.
शिक्षण विभागातील सर्व उणीवा, अडथळे दूर करण्याची, शिक्षकांच्या उपस्थितीबाबत सर्व अडचणी दूर कराव्या, असा प्रस्ताव होता. कोरोना काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत, त्या तात्काळ तपासून पाहाव्यात, असा आग्रहही उद्धव ठाकरे यांनी केला.
गेले काही दिवस महाराष्ट्र सरकार आणि यूजीसी सुप्रीम कोर्टात आमनेसामने आले आहेत. मात्र शैक्षणिक वर्षाबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव आयोगाला मान्य असल्याचे दिसत आहे. सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष जून महिन्यापासून सुरु होते.
दरम्यान, केंद्राने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) कसे राबवायचे याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक समिती नेमणार आहे. समितीत राज्यभरातील विविध विभागातील शिक्षण तज्ज्ञ आणि अभ्यासकांचा समावेश असेल. दरवर्षी जून महिन्याऐवजी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत शैक्षणिक वर्ष भरवता येईल का, याचा समितीने अभ्यास करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.