शिवसेनेच्या पुढाकारानंतर महापालिका प्रशासनाला आली जाग
- निगडी उड्डाणपुलाच्या दोन्ही लेनचे घाईघाईत उद्घाटन
- केवळ प्रसिध्दीसाठी दोन महिने नागरिक वेठीस – संतोष सौंदणकर
पिंपरी / महाईन्यूज
सत्ताधारी भाजपने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात नव्याने बांधलेल्या पुणे-मुंबई व मुंबई-पुणेकडे जाणा-या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या मार्गीकेचे नुकतेच उद्घाटन झाले. परंतु, दोन्ही मार्गिका दोन महिन्यापूर्वी बांधून तयार असताना पुलाचे राजकारण करण्याचे षडयंत्र भाजपने रचले. शिवसेनेने या दोन्ही मार्गिका खुल्या करण्याची मागणी केली असताना त्याकडे दुर्लक्ष करून भाजपने नागरिकांना वेठीस धरले. त्यामुळे भाजपवर सर्वच स्तरातून टिका होऊ लागली. या अपयशाचे खापर आपल्या माथी फुटू लागल्याने सत्ताधा-यांनी उड्डाणपुलाचे घाईघाईत उद्घाटन केले, असा आरोप शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी भाजपवर केला आहे.
सौंदणकर यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस पत्रक दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमधील वैशिष्टय़पूर्ण उड्डाणपुल निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात साकारत आहे. या उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर व वर्तुळाकार मार्गाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या हिताचा एकही निर्णय तडीस लावता आला नाही. आधीच झालेल्या कामाच्या विलंबामुळे वाहनचालकांना सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत होती. अखेरीस निरंकुश सत्ताधारी व झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शहर शिवसेनेने पुढाकार घेतला.
उड्डाणपुलाच्या पुणे-मुंबई व मुंबई पुणे या दोन्ही लेनचे काम पूर्ण झाल्याने तेथून वाहतूक सुरू करावी. वाहनचालक व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शहर शिवसेनेने पालिका प्रशासनाकडे केली होती. त्यावर सत्ताधारी व प्रशासनाला जाग आल्याने उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच उड्डाणपुल खुला होण्यास दोन महिन्यांचा विलंब झाला. पुलाच्या कामाचे श्रेय लाटणाऱ्या सत्ताधारी भाजपचे हेच खरे अपयश आहे. केवळ प्रसिध्दीसाठी नागरिकांना वेठीस धरणा-या सत्ताधा-यांचा खरा चेहरा जनतेपुढे आला आहे. गेली चार वर्षे शहरात आपण काय दिवे लावले ? याचे खरे आत्मचिंतन करण्याची वेळ भाजपवर आली आहे. उद्या जनतेला हिशोब द्यावाच लागणार आहे, असा घणाघात या पत्रकाद्वारे सौंदणकर यांनी भाजपवर केला आहे.