शिवसेना नेते संजय राऊत यांना भाजप नेत्यांनी घेतलं धारेवर, म्हणाले…
ईडीच्या नोटिशीनंतर सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप नेत्यांनी संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय, अशा शब्दात टीका केली आहे.
संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. संजय राऊत आणि भाजपाची चिंता करू नये. काँग्रेस शिवसेनेच्या पार्श्वभागावर रोज लाथा मारतंय त्याची चिंता राऊतांनी करावी, असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. सामना आता वृत्तपत्र राहिलं नाही तर हँडबिल आहे. संविधानाची भाषा करणाऱ्या राऊतांना एक ईडीची नोटीस आली तर भीती का वाटते? असा सवाल भाजप आमदार राम कदमांनी केला आहे.
वाचाः महापालिका आयुक्त कायमच्या सुट्टीवर?, बदलीच्या चर्चांना जोर
भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील ट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे. शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, प्रभादेवीच्या गल्लीत बसून वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या टोप्या बेमालूमपणे उडवणारे आता एवढी का तणतण करत आहेत? निर्दोष असल्याचा कांगावा का करावा लागतोय? गाव का गोळा करावा लागतोय? ज्यांनी खादाडासारखे खाल्ले, त्यांनाच अपचन झालेय,तेच फुसकी हवा सोडून दुर्गंधी करत आहेत. चला हवा येऊ द्या!, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय. तर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे की, विश्वासघातानं सत्तेवर येता येतं पण सत्ता चालवण्यासाठी क्षमता लागते. शिवसेनेने वर्षभरात काहीही केलं नाही. किमान लोकहिताची कामं करा, असं उपाध्ये यांनी म्हटलंय.