शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात:… हे कायद्याचे राज्य!
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे, अशी भूमिका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
संजय राऊत म्हणतात, मुंबईत काल एका माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्या अधिकाऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत प्रसारीत केलेले व्यंगचित्र बदनामीकारक असले तरी त्याच्या वर झालेला हल्ला म्हणजे शिवसैनिकांची संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. तरीही हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. विरोधी पक्षाने या घटनेचे राजकीय भांडवल करावे, हे दुर्दैव आहे. संयम दोन्ही बाजूंनी पाळला गेला पाहिजे पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री या घटनात्मक पदांबाबत टोकाची टीका करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार झाला, तर लोकांचा संयमाचा बांध फुटतो म्हणून सगळ्यांनी जबाबदारीने एकमेकांचा आदर ठेवून वागण्याची ही वेळ आहे समाजात अशांतता निर्माण होऊ नये हे सत्ताधार्यांना इतकेच विरोधकांचे ही कर्तव्य आहे.