‘शिवथाळीही झाली आता शिव दवाखाने येणार’; भाजपाने उडवली खिल्ली
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत केलेल्या विधानावरून निर्माण झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांच्या या विधानाचा समाचार घेतला आहे.शिव वडापाव झालं. ‘ शिवथाळीही झाली आता शिव दवाखाने येणार आहेत,’ अशी टीका भाजपने शिवसेनेवर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला अधिक कळत, असं विधान केलं होतं. राऊत यांच्या विधानाची खिल्ली उडवताना भाजपने ही टीका केली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत शिव दवाखाने. इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कंपाऊंडरकडूनच औषध घेतो, असं म्हटलं होत. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला असून मार्डने राऊत यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. मार्डने याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजीही व्यक्त केली आहे. त्यामुळे चौफेर टीका सहन कराव्या लागलेल्या राऊतांनी या प्रकरणी सारवासारव केली आहे.
“कोरोना संकटाच्या काळात देवदुतासारखे धावून आले. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. अशा डॉक्टरांविषयी आम्हाला नेहमीच आदर आणि आस्था आहे. त्यामुळे त्यांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, असं राऊत म्हणाले. डॉक्टरांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा शिवसेनाच धावून आली. मी स्वत: अनेक प्रकरणात डॉक्टरांची बाजू घेऊन त्यांच्या मागण्या मार्गी लावल्या आहेत. डॉक्टरांना मारहाण झाली तेव्हा तोडफोड करणाऱ्यांना आम्हीच समजावून समेट घडवून आणला आहे. मात्र, सध्या विशिष्ट विचारसरणीचे लोक माझ्या विरोधात मोहीम चालवत आहेत, असं सांगतानाच डॉक्टरांचा मी अपमान केलेला नाही. डॉक्टरांबाबत मी कोणतंही चुकीच विधान केलेलं नाही. कशासाठी डॉक्टराचां अपमान करावा. माझ्या बोलण्याच्या ओघात एक शब्द तुटकपणे येतो आणि त्यावर राजकारण केलं जातं हे चुकीचं आहे, अपमान आणि कोटी यातील फरक समजून घ्या, माझ्या बोलण्यामागची भावना समजून घ्या”, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.