शिर्डी साई मंदिर लवकर खुले न केल्यास शिर्डी ग्रामस्थांचा उपोषण किंवा आंदोलनाचा पावित्रा
लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र, आता हळूहळू काही धार्मिक स्थळे उघडण्यात सुरुवात झाली आहे. अशातच अनेक मंदिरे सुरू झाली असताना शिर्डीचे साईमंदिर बंद का? असा सवाल शिर्डी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. साई मंदिर लवकर खुले न केल्यास उपोषण किंवा आंदोलनाचा पावित्रा शिर्डी ग्रामस्थ तसेच साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि व्यावसायिकांनी घेतला आहे. तर, दुसरीकडे भाजप आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून 29 ऑगस्टला राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती आचार्य तुषार भोसले यांनी दिली आहे.
गेल्या ६ महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिर बंद आहेत. शिर्डीचे साईबाबा मंदिर बंद असल्याने संपूर्ण अर्थकारण पूर्णत: ठप्प झाले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांचे रोजगार देखील हिरावले आहे तर संस्थान देखील आर्थिक कोंडीत सापडल्याने कर्मचा-यांचे पगार कपात करत आहे. सरकारने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा कोर्टात जाण्याबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, साई संस्थानचे माजी विश्वस्त कैलास कोते यांचेसह ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडली.
दुसरीकडे, भाजप आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून राज्यभरातील मंदिर प्रमुखांची काल मंगळवारी बैठक पार पडली आहे. केंद्र सरकारने काही अटी शर्थीवर मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिलेली असताना राज्यसरकार मात्र परवानगी देत नसल्याच्या विरोधात जन आंदोलन करणार आहे. २९ ऑगस्ट रोजी राज्यसरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप आध्यात्मिक सेलचे अध्यक्ष गणेश आचार्य यांनी दिला आहे.