शांतता चर्चेची जबाबदारी पाकिस्तानवर
- अमेरिकेने केली भूमिका स्पष्ट
वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेची मुख्य जबाबदारी पाकिस्तानवरच असून त्यांनी दहशतवादाच्या विरोधात निर्णायक भूमिका घेतली पाहिजे. तरच दोन्ही देशांमध्ये शांतता प्रक्रियाची विधायक सुरूवात होऊ शकते असे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे. या दोन्ही देशांनी विनंती केल्यास काश्मीर प्रश्नात मध्यस्थी करण्याची अध्यक्ष ट्रम्प यांची तयारी आहे असेही अमेरिकेतर्फे आज पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे.
सन 2016 मध्ये पठाणकोटी येथील हवाई दळावर दहशतवादी गटाकडून हल्ला झाला होता. हा हल्ला पाकिस्तान स्थित दहशतवादी गटाकडून झाला असल्याचे उघड झाल्यानंतर भारताने पाक बरोबरची चर्चेची प्रक्रिया थांबवली होती.
त्यातच अलिकडच्या काळात भारताने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेले असून आता पाकिस्ताननेच भारताशी असलेले राजनैतिक संबंध तोडले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये ही चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला पाहिजे असे ट्रम्प प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.