शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळली
पिंपरी – शहरातील पोलीस यंत्रणा दिवेसेंदिवस कुचकामी ठरू लागल्याने शहरात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. गुन्हेगारी घटनांमध्ये वाढल्याने नागरिकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी कार्यक्षम अधिकारी, कर्मचा-यांनी नेमणूक करा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, युवाध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष दिलीप काकडे, गिरिधारी लढ्ढा, सदस्य प्रताप लोके, अशोक मोहिते उमेश इनामदार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, शहराचे नागरीकरण वेगाने वाढत असून गुन्हेगारी घटनाही वाढत असल्याची बाब गंभीर आहे. सोनसाखळी चो-या, घरफोड्या घडत असून महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणाचे गुन्हे सातत्याने समोर येत आहेत. याला शहरातील पोलीस यंत्रणा कुचकामी झाल्याचे कारण आहे.
पोलीस गुन्हेगारी रोखण्यास अपयशी ठरत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. शहरात अवैध दारूचे धंदे, जुगाराचे अड्डे, जागोजागी अवैध वेश्याव्यवसाय, बेटिंग सेन्टर्स बिनधास्तपणे सुरु आहेत. मागील आठवड्यात निगडीत भरदिवसा 40-45 लाखांचा दरोडा पडला. पण, त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. अवैध धंदे राजकारण्यांच्या सहभागाने सुरू असून त्याला सुरक्षितता देण्यास पोलीस व्यस्त आहेत. नागरिकाची तक्रार सहजपणे नोंदवून घेतली जात नाही. तक्रारदारांना पोलिसांकडूनच अधिक त्रास दिला जातो.
शहरातील पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांचे यावर नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. कायदा व सुव्यस्थेसाठी शहरातील पोलिसांची फेररचना गरजेची आहे. तातडीने अधिक कार्यक्षम व कर्तव्यतत्पर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती शहरात व्हावी, अशी मागणीने समितीने पत्रात केली आहे.