शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई | आपल्या दोन दिवसीय कोकण दौऱ्यानंतर माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत पवारांनी कोकणातील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा लेखाजोखा मांडत कोकणाला पुन्हा उभं करण्यासाठीचा अॅक्शन प्लॅनच मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे. या बैठकीत नुकसान भरपाईत वाढ करण्याच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. तसेच विद्युत आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजन करण्याचं निश्चित करण्यात आलं.
चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणातील या भागात फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी या भेटीत सांगितलं. यासाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्याची तयारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली आहे. फळबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची जुनी रोजगार हमी योजना लागू करण्याची गरज असल्याचा मुद्दाही शरद पवार यांनी बैठकीत मांडला. कचऱ्याचे ढिगारे साफ करुन घरे, बागा आणि दुकाने स्वच्छ करावी लागतील. हे मोठं काम असल्याने यासाठी रोजगार हमी योजनेचा वापर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.