शनी शिंगणापूर देवस्थान आता राज्य सरकारच्या नियंत्रणात
शनी शिंगणापूर : भक्तांच्या साडेसातीचं विघ्न हाटवणारा, अशी शनी शिंगणापूरच्या शनी देवाची ख्याती आहे. मात्र आता हे देवस्थान राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे अगामी काळात शनी देवावर राजकारण्यांचा वरदहस्त राहणार आहे.
देवस्थानच्या कारभारावर भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर ग्रामसभेनं ठराव करुन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणी सरकारने समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार देवस्थान ताब्यात घेण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने राजकीय महत्वकांक्षेतून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. देवस्थानवर राजकीय अंकुश राहणार असल्याने विकास आणि पारदर्शक कारभाराकde लक्ष असणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाने गावकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची भावना आहे. श्री शनी देवस्थानच्या घटनेनुसार शनी शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात येते. शनी शिंगणापूरचा मूळ रहिवासी हा विश्वस्त होण्यास पात्र आहे. याबाबत संस्थानचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष बाबूराव बानकर यांनी 2000 साली घटनेत विशेष तरतूद करुन घेतली. अहमदनगर सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी 27/2000 या आदेशानुसार मंजुरी दिली आहे. तेव्हापासून आजपर्यंत देवस्थानचा विश्वस्त शिंगणापूरचा मूळ रहिवासी राहिला आहे.
श्री शनैश्वर देवस्थानचं अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह 11 विश्वस्त आहे. सध्या देवस्थानच्या विश्वस्त मंडळात अध्यक्षासह दोन महिला आणि नऊ पुरुष आहे. अनिता शेटे या देवस्थानच्या विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नानासाहेब बानकर आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या शनी चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन छेडलं होतं. यानंतर 2016 साली प्रथमच विश्वस्त मंडळात दोन महिलांना संधी मिळाली तर शेटे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.