”वेध सामाजिक जाणिवांचा” हे आशयपूर्ण आकृतिबंध जपणारे पुस्तक – ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे
पिंपरी |महाईन्यूज|
“वेध सामाजिक जाणिवांचा” हे आशयपूर्ण, समृद्ध आणि परिपूर्ण आकृतिबंध जपणारे पुस्तक आहे. लेखकाला सामाजिक भूमिका आणि सामाजिक अधिष्ठान असल्याने पत्रकारिता, साहित्य, कामगार चळवळ, राजकारण, समाजकारण आणि गिर्यारोहण अशा सर्व क्षेत्रांत ते सहजतेने समरस होवू शकले. अशा अनुभवसमद्ध लेखकाने लिहीलेले हे पुस्तक सर्वच क्षेत्रातील तरुणांना प्रेरणादायी ठरेल. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे यांनी पिंपरीत बोलताना केले. अरुण बोऱ्हाडे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “वेध सामाजिक जाणिवांचा” आणि “माय माझी इंद्रायणी ” या पुस्तकांविषयी आयोजित “युवा साहित्य संवाद” या कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय विभाग आणि पदवीधर संघाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा आणि राष्ट्रीय युवक दिनानिमित्त ‘युवा साहित्य संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील म्हणाले की, या दोन्ही पुस्तकांमध्ये माणसाला बोलते करणारी, माणूसकीला आळविणारी आणि अध्यात्माशी नाते सांगणारी ओघवती भाषाशैली आहे. म्हणून ही पुस्तके वाचनीय आहेत. कविता सुचविणारी एक अध्यात्मिक शक्ती असते. शब्दांना बोलते जरूर करावे, पण ऐकण्याचीही तपश्चर्या करावी लागते. मौनामध्येही विलक्षण ताकद असते, असे अरुण बोऱ्हाडे यांच्या कवितेचा संदेश असल्याचे कवी राज अहेरराव यांनी यावेळी सांगितले.
या साहित्य संवादामध्ये प्राध्यापक किशोर निकम यांनीही आपले मत व्यक्त केले. “वेद सामाजिक जाणिवांचा” हे आजच्या तरुणाईला प्रेरणादायी व पथदर्शक साहित्य असल्याचे ते म्हणाले. लेखक अरुण बोऱ्हाडे यांचा परिसरातील राजकीय परिस्थितीचा आणि सामाजिक जाणिवांचा सखोल अभ्यास आहे. शिवाय ते स्वतः संवेदनशील मनाचे असल्याने त्यांनी अंतर्मनाचा अचूक वेध घेतला असल्याचे लेखिका डॉ. सीमा सागर काळभोर यांनी सांगितले. तर लेखकावर त्यांच्या गावातील सामाजिक संस्कारांचा विशेष पगडा असल्याचे प्राध्यापिका डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी सांगितले.
संजोग वाघेरे म्हणाले की, अरुण बोऱ्हाडे हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत असले तरी त्यांच्या साहित्यिक जाणिवा समृद्ध आहेत. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथालय विभाग प्रमुख श्री संग्राम चव्हाण आणि पदवीधर संघाचे अध्यक्ष श्री माधव पाटील यांनी केले. श्री संपत पाचुंदकर यांनी आभार मानले.