वीरशैव महासभेच्या ‘या’ मागणीने कर्नाटकात नवीन वाद ?
बंगळुरू : कर्नाटकातील सत्तासंघर्षांचा गुंता दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कुमारस्वामी यांच्या शपथविधीआधीच नवीन संकट निर्माण झाले आहे. लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्रिपद द्या, अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय वीरशैव महासभेने कुमारस्वामींना लिहिले आहे. त्यामुळे नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कुमारस्वामी बुधवारी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे 13 मंत्री व काँग्रेसचे 20 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित मानले जात आहे. शपथविधीनंतर आपण 24 तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी 15 दिवसांचा अवधी दिला आहे.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणे नक्की आहे. तसेच काँग्रेस फोडण्याची येडियुरप्पांची खेळी उधळून लावणारे डी. के. शिवकुमार यांचेही मंत्रिमंडळातील स्थान नक्की आहे. कुमारस्वामींच्या पक्षाकडे वित्त खाते, तर काँग्रेसकडे गृह खाते राहील, असे सध्याचे चित्र आहे. हीच दोन अतिशय महत्त्वाची खाती मानली जातात. काँग्रेसकडून अधिकाधिक लिंगायत आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असा अंदाज आहे. येडियुरप्पा यांचे भविष्यातील डाव यशस्वी होऊ नयेत, यासाठीच हे केले जाईल .बसपा, एक अपक्ष व एक मुस्लीम आमदारही सरकारमध्ये असेल.