वीजमंडळाचा नागरिकांना झटका; सहा वर्षांनी आकारले जाताहेत फिक्स्ड चार्जेस
पिंपरी |महाईन्यूज|
लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारींचा निपटारा होत नाही तोवरच महावितरणने नागरिकांना नवीन धक्का दिला आहे. रावेत येथील सेलेस्टीअल सिटी मधील १२६ नागरिकांना तब्बल सहा वर्षांनी सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीच्या आधारावर फिक्स्ड चार्जेस आकारण्यात आले आहेत.
चार्जेस कसे ठरवले जातात ?महावितरण तर्फे बिल आकारताना सिंगल फेज आणि थ्री फेजच्या जोडणीच्या आधारावर फिक्स्ड चार्जेस ठरले जातात. त्यासाठी नागरिकांना मीटर दिल्यानंतर त्याची महावितरण कडे नोंद केली जाते. पण महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे गेले सहा वर्ष सिंगल फेज नुसार बिल आकारण्यात येत होते. मीटर रिडींग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचारी वर्गास पण हे आजतागायत कळले नाही. आता अचानक तब्बल सहा वर्षांनी महावितरणला हा शोध लागला. पण यात नागरिकांची कुठलीही चूक नसताना अचानक खुप ज्यादा बिल आल्याने नागरिक संतापले आहेत.
वीज जोडणी दिल्यानंतर त्याविषयीचे ज्यादा चार्जेस आकारण्याचा किंवा वसुलीचा अधिकार 3 वर्षापर्यंत महावितरणला असतो. परंतु, या नागरिकांना वीज जोडून घेऊन 6 वर्ष अधिक कालावधी उलटला आहे. तसेच रहिवाशी घरांना सिंगल फेज असतांना थ्री फेजची गरजच काय, असाही सवाल जाणकारांकडून उपस्थित होत आहे.
स्वतःच्या चुकीमुळे सहा वर्षांनी असे सामायिक चार्जेस आकारण्याचा महावितरणला अधिकार आहे का ? त्यांच्या चुकीमुळे नागरिकांना हा भुर्दंड का बसावा ? वीज कनेक्शन जोडणी करताना वीजमहामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकीमुळे नागरिकांना विनाकारण बुर्दंड बसत आहे. काही घरमालकांनी घर भाड्याने दिली आहेत; भाडेकरूंनी बिल भरण्यास नकार दिल्याने घरमालकावर अचानक ताण येत आहे. कर्मचारी व अधिकारी यांच्या चुकीमुळे वीजमंडळाला फटका बसला आहे, त्यांच्या पगारातुन ही रक्कम जमा करावी. इतक्या वर्षांनंतर नागरिकांकडे मागणी करणे चुकीचे आहे. – प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्ष, सेलेस्टीअल सिटी फेडेरेशन, रावेत.