विवाहमंडपात नवरा दारु पिऊन आला, नवरीमुलीने मोडले लग्न
लग्नाचे विधी सुरु व्हायला काही मिनिटे उरलेली असताना नवरदेव दारुच्या नशेत विवाहमंडपात पोहोचल्यामुळे नवरीमुलीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. बिहारच्या दुमरी छापिया गावात शनिवारी ही घटना घडली. रिंकी कुमारी असे नवरीमुलीचे नाव असून तिचे बबलू कुमार बरोबर लग्न होणार होते.
नवरा मुलगा इतका दारु प्यायला होता की, आपल्या आसपास काय सुरु आहे हे सुद्धा त्याला कळत नव्हते. तो लग्नमंडपात चुकीच्या पद्धतीने वागत होता. त्यामुळे माझ्या मुलीने लग्न करण्यास नकार दिला असे रिंकी कुमारीचे वडिल त्रिभुवन शाह यांनी सांगितले.
नवरा मुलगा इतका दारु प्यायला होता की तो स्वत:च्या पायावरही उभा राहू शकत नव्हता. त्यामुळे नवरीमुलीने लग्नमंडपातून काढता पाय घेतला असे एका नातेवाईकाने सांगितले. नवरी मुलीने लग्नाला तयार व्हावे यासाठी दोन्ही कुटुंबांनी नवरी मुलीची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिने आपला निर्णय बदलला नाही. हुंडयामध्ये घेतलेली संपूर्ण रक्कम परत करेपर्यंत गावकऱ्यांनी नवऱ्या मुलाला मंडपाबाहेर जाऊ दिले नाही.