विराटचा दृष्टिकोन हेच त्याच्या यशाचे गुपित – संजय बांगर
बर्मिंगहॅम: विराट कोहलीचा फलंदाजी करतानाचा दृष्टिकोन आणि परिस्थितीचा अचूक अंदाज घेण्याची क्षमता हेच इंग्लंडमधील त्याच्या पहिल्या शतकामागचे गुपित असल्याचे भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटले आहे.
इंग्लंड विरुद्धसुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या दोन्ही डावांत इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरत असताना विराट कोहलीने आपल्या फलंदाजीत संयम आणि आक्रमणाचा संगम साधताना एक बाजू लावून धरत भारतीय संघाचा डाव तर सावरलाच, पण इंग्लंडच्या भूमीवर आपले पहिले शतक झळकावताना 149 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या डावांतही विराटने 51 धावांची भारताविरुद्ध सर्वोच्च खेळी केली.
इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी विराटच्या कामगिरीची चर्चा अधिक रंगली होती. त्याला 2014च्या इंग्लंड दौऱ्यात दहा डावांत एकूण 134 धावा करता आल्या होत्या. पण, त्याने या दौऱ्यातील पहिल्या डावातच 149 धावांची धमाकेदार खेळी करताना त्याने 2014 च्या अपयशाला मागे टाकून जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध केले.बरेचसे फलंदाज परिस्थितीनुसार फलंदाजी करत नाहीत. त्यामुळे ते अनेकदा अपयशाला सामोरे जातात असे सांगून बांगर म्हणाले की, विराटने मात्र परिस्थितीची जाण ठेवून त्यानुसार फलंदाजी करण्याचा गुण आत्मसात केला असून त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत चांगली फलंदाजी करू शकतो. त्याच बरोबर तो त्याच त्या चुका करणे टाळतो व त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजी करताना त्याला झालेला आहे.
आज काल सर्वांना व्हिडीओ ऍनालिसीसमुळे फलंदाजांचे कच्चे दुवे माहीत असतात. त्यामुळे फलंदाजाने आपले कच्चे दुवे वेळीच ओळखून त्यांच्यावर काम करताना त्यांच्यातून होणारे नुकसान टाळावे. आणि नेमक हेच काही फलंदाज करत नाहीत. मात्र, विराटने सरावाच्या वेळी आपल्यातील कच्चे दुवे शोधून त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याने त्याला यश मिळाले आहे असे संजय बांगर यांनी सांगितले.