विमान अपघातात आठ भारतीयांचा मृत्यू
कॅनडात वास्तव्य असलेल्या भारतीय कुटुंबातील सहा सदस्यांचा इथिओपियाच्या विमानाला झालेल्या अपघातात मृत्यू झाला असे कॅनडेयिन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. तर इथिओपियातील दूतावासातून मिळालेल्या माहितीनुसार यात चार भारतीय नागरिक ठार झाले आहेत. हे विमान नैरोबीला जाताना आदिसअबाबा येथून उड्डाणानंतर लगेच कोसळले होते. या अपघातात रविवारी १५७ जण ठार झाले.
कॅनडेयिन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार भारतीय कुटुंबातील सहाजण यात मरण पावले. त्यात पन्नागेश वैद्य (७३), त्यांची पत्नी हंसिनी वैद्य (६७), त्यांची कन्या कोशा वैद्य (३७), तिचा पती प्रेरित दीक्षित (४५) व त्यांची दोन मुले अनुष्का व अश्का या सर्वाचा अपघातात मृत्यू झाला. सुरत येथील वैद्य दांपत्य हे भारतीय होते. त्यांची कन्या व तिचा पती हे कॅनडाचे नागरिक होते पण मूळ भारतीय वंशाचे होते.
इथिओपियातील दूतावासातून मिळालेल्या माहितीनुसार यात चार भारतीय नागरिक ठार झाले असून त्यात पन्नागेश व हंसिनी वैद्य, अमेरिकेतील डॉक्टर नुकावरपू मनीषा, संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमातील पर्यावरण अधिकारी शिखा गर्ग यांचा समावेश आहे.
ब्रिटनमध्येही बोईंग ७३७ मॅक्सवर बंदी
इथिओपियाच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर चार देशांनी बोईंग ७३७ मॅक्स विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली होती. या बंदीपाठोपाठ मंगळवारी ब्रिटननेही या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, मलेशिया व ओमान या देशांनी याच प्रकारच्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे.