विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकं, रेल्वे गाड्यांचं खासगीकरण होणार?
देशातील सहा विमानतळांच्या खासगीकरणानंतर सरकार देशातील ५० रेल्वे स्थानकं आणि १५० रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणाचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सचिव स्तरावरील एका पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हि.के.यादव यांना पत्र पाठवले आहे. तसंच यामध्ये देशातील १५० रेल्वे गाड्या आणि ५० रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याचं सुचवण्यात आलं आहे. देशातील ४०० निवडक स्थानकांचा कायापालट करण्याचा रेल्वेचा मानस होता.
आपली रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यानुसार सुरूवातीला किमान ५० रेल्वे स्थानकांवर या कामाची सुरूवात झाली पाहिजे. ज्याप्रमाणे देशातील सहा विमानतळांचं खासगीकरण करण्यात आलं त्याच धर्तीवर काही रेल्वे स्थानकं आणि रेल्वे गाड्यांचं खासगीकरण करणं आवश्यक आहे. त्यासाठी सुरूवातील १५० रेल्वे स्थानकांची निवड करून खासगीकरण करण्याचं कांत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. यापूर्वी उत्तम सेवा देण्याच्या हेतूनं तेजस एक्स्प्रेसचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.