विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली – कोरोना संकटकाळात विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर १८ ऑगस्टला सुनावणी झाली होती. या सुनावणीवेळी न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायालय आज याबाबतचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यूजीसीने देशभरातील विद्यापीठांना 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र महाराष्ट्र, पंजाब, दिल्लीसह 13 राज्यांच्या सरकारचा कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा घेण्यास विरोध आहे. ‘यूजीसी’ मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. 640 पैकी 454 विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याचे ‘यूजीसी’ने सांगितले आहे. परंतु ‘यूजीसी’च्या परीक्षासक्तीला 31 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने होत असताना जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेनेही परीक्षा घेण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.