विदर्भात वादळी पावसासह गारपीट
- गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान
गुरुवारी रात्री सुरू झालेल्या वादळी पावसाने विदर्भाला झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारपीट झाली. या गारपिटीमुळे गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. हा पाऊस आज शुक्रवारीही अनेक ठिकाणी सुरूच होता.
राज्यातले पूर्व भागातील हवामान अस्थिर झाल्यामुळे विदर्भात तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी आधीच व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला असून २४ जानेवारीलाच विजांचा कडकडाट आणि गारांसह पावसाने हजेरी लावली. उपराजधानीत गारपीट झाली नसली तरीही कोराडी, कळमेश्वर या आसपासच्या परिसरात लिंबाएवढय़ा गारा पडल्या. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यत ढगाळ वातावरण होते, तर वाशीम जिल्ह्यतील कारपा आणि दोनटबू येथे वादळी वाऱ्यासह तुरळक गारपीट झाली.
अमरावती जिल्ह्यतही गुरुवारी अवकाळी पाऊस आणि वादळी वारा तसेच गारपिटीमुळे गहू, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धामणगाव रेल्वे तालुक्याला मोठा फटका बसला. याशिवाय भातकुली, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड येथेही शेतमालाचे नुकसान झाले. शहरातही रिमझिम पाऊस होता. भंडारा जिल्ह्यतील सीमावर्ती भागात मौद्याजवळ पावसाने गारपिटीसह हजेरी लावली. चंद्रपूर जिल्ह्यतही शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस झाला. शहरातल्या अनेक भागात गारपीट झाली. काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा बराच काळ खंडित झाला होता. वर्धा येथेही गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी थोडय़ाफार प्रमाणात पाऊस पडला.