विजय मल्ल्याच्या खटल्याची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयातून गायब
नवी दिल्ली – भारतीय बँकाना १६००कोटींचा चुना लावून परदेशात फरारझालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी २० ऑगस्टपर्यंत टाळण्यात आली आहे. कारण, या खटल्यासंदर्भातील फाईलमधील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाली आहेत. सर्वोच्च न्यायायलायने ही धक्कादायक माहिती दिली.
न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्या प्रकरणीचा हा खटला सुरू आहे. मल्ल्याला २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी दोषी ठरवले होते. मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊन स्वत:ची संपत्ती कुटुंबाच्या नावावर केली होती. या खटल्यासंदर्भातील विजय मल्ल्या संदर्भातील एकही कागदपत्र मिळत नाही. यामुळे गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. मल्ल्याने तीन वर्षापूर्वी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ज्याची तारीख आज आली.
मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत संपत्ती मुलांच्या नावे केली होती. त्यामुळे मल्ल्याला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी मल्ल्याने याचिका दाखल केली होती.
विजय मल्ल्याची याचिका उशिराने लिस्ट केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रीवर नाराजी व्यक्त केली होती. २०१७ साळी दिलेल्या आदेशावरील पुनर्विचार याचिका आता सुनावणीस आली होती. ही याचिका आतापर्यंत का न्यायालयासमोर आली नव्हती अशी विचारणा रजिस्ट्रीकडे करण्यात आली होती. तसेच यावर दोन आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले होते.