वारक-यांच्या भेटवस्तूचे राजकारण करुन वारी सोहळ्याला गालबोट लावू नका – एकनाथ पवार
मुलभूत साेयी-सुविधा द्या, आळंदी व देहू संस्थानिकाची मागणी
पिंपरी – आषाढीवारी पालखी सोहळ्यात महापालिकेकडून दरवर्षी दिंडी प्रमुखाना भेटवस्तू देण्यात येते. मात्र, भेटवस्तूचा सर्व वारक-यांना लाभ होत नाही. त्यामुळे प्रत्येक वारक-यांच्या दृष्टीने त्यांच्या गरजा पुर्ण व्हाव्यात, याकरिता पाणी, जनरेटर, मोबाईल शाैचालये, वैद्यकीय आणि आरोग्यांसह अन्य मूलभूत सोयी-सुविधा देण्याचा आग्रह आळंदी व देहू संस्थेच्या विश्वस्तांनी पालखी सोहळ्याच्या आढावा बैठकीत केला. परंतू, वारक-यांना देणा-या भेटवस्तूचे राजकारण करुन आरोप-प्रत्यारोपाने संपुर्ण वारी सोहळ्याला गालबोट लावण्याचे काम करु नये, असा टोला सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना लगावला.
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्यात दरवर्षी देणा-या भेटवस्तूची परंपरा यंदा खंडीत केल्याने सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचे भाजपकडून स्वागत करण्यात येईल, उच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार भेटवस्तू देण्याबाबत कोणतीही मागणी दोन्ही संस्थानच्या पदाधिका-यांनी केलेली नाही. मात्र, त्या प्रत्येक वारक-याला मुलभूत सोयी-सुविधा देण्यास आमच्याकडून कसलीही हयगय न करता सक्षमपणे सुविधा देणार आहे.
तसेच वारक-यांना भेटवस्तू देण्याची तयारी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे याची आहे. पण संस्थानिकांची मागणी नसताना त्यांच्यावर भेटवस्तू जबरदस्तीने लादणे हे चुकीचे आहे. त्यानंतर भेटवस्तूचे राजकारण करुन आरोप-प्रत्यारोपाने वारक-यांचा अपमान करणे हे योग्य होणार नाही. विरोधी पक्षनेत्यांनी चांगल्या गोष्टीला पाठिंबा द्यावा, केवळ विरोधला विरोध करणे हे चुकीचे आहे. तसेच महापालिकेच्या तिजोरीतून एकही रुपया न घेता स्वागत कमानी भाजपकडून उभारण्यात येणार आहेत. त्याशिवाय नगरसेवकांच्या एकत्रित मानधनातून भेटवस्तू द्या की नाही याबाबत सोमवारी (दि.2) महापाैर दालनात सर्वपक्षीय बैठक घेवून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही पक्षनेते पवार यांनी यावेळी सांगितले.
उच्च न्यायालयाचे निर्देश
सण-सोहळ्यावर महानगरपालिकेकडून कोणताही खर्च करु नये, याबाबत उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाकडून दिलेल्या आदेशाचे संबंधित विभागानी काटेकोर अंमलबजावणी करावी, यात अनियमितता झाल्यास सण सोहळ्यावर खर्च प्रस्तावित करणारे संबंधित विभाग प्रमुख जबाबदार राहतील. याबाबत वेळोवेळी एकत्रित आढावा घेवून त्यावर जनसंपर्क विभागाने नियंत्रण ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.