वल्लभनगरमध्ये कच-यांच्या धुराने नागरिक हैराण
पिंपरी – वल्लभनगर येथील खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो अद्याप धुमसतच राहिला आहे. सहा दिवसापासून चोवीस तास पाण्याचा फवारा मारुनही धुराचे लोट सुरुच आहेत. त्यावर जेसीबी यंत्राने माती टाकून देखील काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे या धुरामुळे परिसरातील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचा वल्लभनगर येथील कचरा डेपो २२ एकर जागेवर पसरला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा डेपो असून, त्याला लागणारी सततची आग व दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याबाबत त्यांनी कॅंटोन्मेंट बोर्ड, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. त्यामुळे कॅंटोन्मेंट बोर्डाने सुका कचरा टाकणे बंद केलेले आहे. मात्र, जुना कचरा तसाच असून, त्यालाच गेल्या गुरुवारी (ता. २९ मार्च) सायंकाळी आग लागली होती. ती शमविण्याचे काम गेल्या सहा दिवसांपासून रात्रंदिवस सुरू आहे. वर आग शमलेली दिसत असली तरी, आतून धुमसत असल्याने धुराचे लोट निघत आहेत. ही परिस्थिती मंगळवारी (ता. ३) सायंकाळपर्यंत कायम होती. हवेच्या झोतानुसार धूर पसरत असल्याने कचरा डेपोच्या चारही बाजूच्या नागरी वस्तीला त्याचा त्रास होत आहे. प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याची अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, नाशिक फाटा, कासारवाडी परिसर, दाई-ईची कंपनी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी), भोसरी पोलिस ठाणे व वसाहत, सुखवानी कॅम्पस सोसायटी, वल्लभनगर एसटी बसस्थानक, संत तुकारामनगर, वायसीएम रुग्णालय परिसर, महात्मा फुलेनगर या भागासह पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्गाने जाणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना कचरा डेपोतील धुराचा सर्वाधिक त्रास होत आहे.