वर्हाडी बनून लग्नात नवरीमुलीचे दागिने चोरणाऱ्या पती-पत्नीला अटक
लग्नात वर्हाडी बनून नवरी मुलीच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या नवरा-बायकोला अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपये जप्त करण्यात आले असून चोरी करण्याऱ्या पती पत्नीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली.
विलास दगडे आणि जयश्री दगडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी पती-पत्नींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील अनेक मंगल कार्यालयात वधू पक्षाच्या विभागात अनोळखी पती-पत्नींनी चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यानुसार अशा चोर्या रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
दोघे पती अणि पत्नी यवत येथील समृद्धी मंगल कार्यालयात येणार असल्याची माहिती एका खबर्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार आम्ही समृद्धी मंगल कार्यालयात सापळा रचला. कार्यालय परिसरात येताच त्यांच्याकडे असलेल्या गाडीची झडती घेतली. त्या दोघांकडे सोने आढळून आले. त्यावर अधिक चौकशी केल्यावर त्यांनी जिल्ह्यातील अनेक मंगल कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली. ९२ तोळे सोने, एक चार चाकी गाडी, १० मोबाईल हँड सेट आणि चार लाख रुपये जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
चोरी कशा प्रकारे करायचे
विलास दगडे आणि त्याची पत्नी जयश्री दगडे हे दोघे पती पत्नी काही महिन्यापूर्वी पुण्यातील चंदननगर भागात कामानिमित्त आले होते. त्याच दरम्यान काही लग्नास जाण्यास सुरवात केली. मुलीकडे गेल्यावर आम्ही मुलाकडच्या बाजूचे आहोत आणि मुलांकडे गेल्यावर आम्ही मुलींच्या बाजूचे आहोत असे सांगत असतं. दोन्ही बाजूच्या मंडळींचा विश्वास संपादन करताना लग्नात हजार रुपयांचा आहेर देखील देत असत. त्यानंतर काही वेळात मुलीचे सोने चोरून पसार होतं. या चोर्या मधून पैसा मिळत असल्याने दोघा पती पत्नीने चार चाकी गाडी देखील घेतली.