वटवाघूळ हे निपाह पसरण्याचे कारण नाही – अहवाल
तिरुअनंतपुरम (केरळ) – केरळमधील कोझीकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये निपाह व्हायरसने 12 जणांचा बळी घेतला होता. निपाह वटवाघळांमार्फत पसरतो असे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र निपाह व्हायरस वटवाघळांमार्फत पसरत नसल्याचे तपासण्या केल्यानंतर दिसून आले आहे. तपासणीनंतर आलेले अहवाल मेडिकल टीमने आरोग्य मंत्रालयाला दिलेले आहेत. वटवाघळे आणि डुकरे यांच्यामुले निपाह पसरत नसल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
निपाह पसरण्याचा इतर कारणांचा शोध घेण्याचे काम मेडिकल टीम आता करत आहे. वटवाघळांच्या सात प्रजातींचे, डुकरांच्या दोन प्रजातींचे आदी मिळून एकूण 21 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. भोपाळमधील नॅशनल इन्स्ट्टिूट आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरल डिसीझेसकडे हे नमुने पाठवण्यात आले होते. ज्या ठिकाणी सर्वप्रथम निपाह व्हायरसचे प्रकरण उघडकीस आले होते, त्या ठिकाणच्या वटवाघळांचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशात मृत आढळलेल्या आणि हैद्राबधील वटवाघळांचे नमुनेही पाठवले होते. या सर्वांचे अहवाल “निगेटिव्ह’ आले आहेत.
आता निपाह पसरवणाऱ्या अन्य स्रोतांचा तपास चालू आहे. त्यासाठी आम्हाला रुग्णांनी काय खाल्ले होते, कोणाच्या संपर्कात ते आले होते आदी इतिहास पाहावा लागेल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान केरळ सरकारने कोझीकोड, मलप्पुरम, वायनाड आणि कन्नूर या चार जिल्ह्यांमध्ये न जाण्याचे आवाहन केले आहे.