‘वंचित’ने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ३२ जागा पाडल्या
महाईन्यूज | मुंबई | लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षासोबत युती केली नव्हती. लोकसभेत सोबत असलेला खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबतही आंबेडकर यांनी ऐनवेळी युती तोडली. त्यामुळे राज्यातील २८८ मतदारसंघात वंचितने उमेदवार उभे केले होते. भाजपची बी टीम असल्याचा वंचितवर आधीपासूनच आरोप केला जात आहे. परंतु, हा आरोप वंचितच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा निवडणुकीत चांगल यश मिळवलेल्या काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीसोबत वंचितची आघाडी झाली असती तर राज्यातील चित्र आणखी वेगळे दिसले असते असे निवडणूक निकालावरून आता स्पष्ट झाले आहे.